उपसंपादक – ( शाहरुख शेख )
कोंढवा खुर्द येथील नवाजिश चौक परिसरात रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या हातगाड्या, अतिक्रमण करून बाहेर आलेली दुकाने तसेच दुकानाबाहेर रस्त्यावरच मांडलेली विक्रीची सामग्री यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या बेजबाबदार अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता अक्षरशः अरुंद झाला असून दररोज नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे, नवाजिश चौकात राहणाऱ्या नागरिकांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी अवघा काही मिनिटांचा प्रवास आता अर्धा ते एक तास लागत आहे. सकाळी कामावर जाणारे कर्मचारी, शाळकरी मुले, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना देखील या ट्राफिक जामचा फटका बसत आहे. अनेक वेळा वाद, हॉर्नचा गोंगाट आणि अपघातांची शक्यता निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल आहे की, महानगरपालिका याकडे डोळेझाक का करत आहे? वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी असताना केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
याबाबत संबंधित नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून, रस्त्यावरील हातगाड्या व बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
नवाजिश चौकातील हा ट्राफिक कोंडमारा कधी संपणार?
महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी जागे होतील का?
नागरिक उत्तराची वाट पाहत आहेत.








