उपसंपादक – ( शाहरुख शेख )
कोंढवा (पुणे) – शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अंजुमणे राबिया या सामाजिक-शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ट्राफिक पोलिसांच्या सहकार्याने कोंढवा येथील ज्योती चौक परिसरात जनजागृती रॅली काढली.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरा, सिग्नलचे पालन करा, दारू पिऊन वाहन चालवू नका, वाहतुकीचे नियम पाळा – जीव वाचवा अशा आशयाचे फलक व घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
ट्राफिक पोलिसांनीही रॅलीदरम्यान नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले. विशेषतः दुचाकी व चारचाकी चालकांनी नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश गेला असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून झालेली ही जनजागृती रॅली कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली










