**कोंढव्यातील वाहतूक कोंडी नागरिकांच्या जीवावर? बैतुल उलूम मद्रसा ते सर्वे नं. ४२ जे.के. पार्क रस्ता कधी होणार ट्रॅफिकमुक्त!**


उपसंपादक – ( शाहरुख शेख )

कोंढवा परिसरातील बैतुल उलूम मद्रसा ते सर्वे नंबर ४२, जे.के. पार्क या मुख्य रस्त्यावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सकाळी व संध्याकाळी तर या रस्त्यावर वाहनांची रांग लागते आणि सामान्य नागरिकांसह शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, ॲम्बुलन्ससारखी अत्यावश्यक सेवा देखील या ट्रॅफिकमध्ये अडकत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेक वेळा रुग्णवाहिका वेळेवर पुढे जाऊ शकत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“जर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्बुलन्समध्ये एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?”

असा थेट सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

या रस्त्यावर अनियंत्रित पार्किंग, अरुंद रस्ता, वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलीस व प्रशासनाचे अपुरे नियोजन ही मुख्य कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.

अलीकडेच नवीन नगरसेवक निवडून आलेले असताना, स्थानिक नागरिकांना या प्रश्नावर त्वरित उपाययोजना अपेक्षित आहेत.

“फक्त आश्वासन नको, तर कायमस्वरूपी उपाय हवा,”

अशी स्पष्ट मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

नागरिकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी

अनधिकृत पार्किंगवर तात्काळ कारवाई करावी

आवश्यक असल्यास वन-वे किंवा पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी

रुग्णवाहिकांसाठी फ्री कॉरिडॉर निश्चित करावा

जर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी कोंढव्यातून होत आहे.


6
कृपया वोट करा

संविधान न्यूज़च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!