लेखक – ( उत्कर्ष किशोर भदाणे )
भारत हा तरुणांचा देश आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येतील मोठा वाटा युवकांचा असताना, आजचा युवक राजकारणापासून दूर जात असल्याचं चित्र दिसत आहे. “राजकारण म्हणजे घाण”, “आपण त्यात पडून काही उपयोग नाही”, “मतदान करून काय फरक पडतो?” अशा भावना युवकांमध्ये वाढत आहेत. ही उदासीनता केवळ युवकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण लोकशाहीसाठी चिंताजनक आहे.
राजकारण हा शब्द अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरला जातो. मात्र प्रत्यक्षात राजकारण म्हणजे समाजाच्या भवितव्याशी निगडित निर्णयप्रक्रिया. शिक्षण व्यवस्था, आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती, शेतकरी धोरण, पायाभूत सुविधा, महिला व युवक सुरक्षा-हे सर्व विषय राजकीय निर्णयांवर अवलंबून असतात. युवक जर या प्रक्रियेत सहभागी नसतील, तर त्यांच्याच आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय त्यांच्या अनुपस्थितीत घेतले जातात.
आजचा युवक माहितीपूर्ण आहे, तंत्रज्ञानस्नेही आहे आणि जागरूकही आहे. तरीसुद्धा तो राजकारणापासून दूर का राहतो, याची कारणे आत्मपरीक्षणाची मागणी करतात. राजकारणातील भ्रष्टाचार, नकारात्मक प्रतिमा, तरुणांना संधी न मिळणं, तसेच योग्य राजकीय शिक्षणाचा अभाव -या बाबी युवकांना दुरावतात. मात्र या दूरतेचा फायदा समाजहिताला नक्कीच होत नाही.
लोकशाहीत मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांची जबाबदारी आहे. अनेक वेळा निवडणुकांचे निकाल अत्यल्प मतांनी ठरतात. अशा वेळी युवकांनी मतदान न करणं म्हणजे स्वतःच्या भवितव्याबाबत उदासीन राहणं होय. युवक मोठ्या संख्येने मतदान करतील, तर रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, स्टार्टअप्स यांसारख्या विषयांना राजकीय अजेंड्यावर अग्रक्रम मिळू शकतो.
युवकांनी केवळ मतदानापुरताच सहभाग मर्यादित ठेवावा, असं नाही. ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यार्थी संघटना, सामाजिक चळवळी-या माध्यमांतून युवक सक्रिय भूमिका बजावू शकतात. राजकारणात प्रवेश म्हणजे लगेच पद मिळवणं नव्हे, तर प्रश्न मांडणं, उपाय सुचवणं आणि जबाबदारीने सहभाग घेणं ही त्याची सुरुवात आहे.
राजकारण स्वच्छ हवं असेल, तर चांगल्या, प्रामाणिक आणि शिक्षित युवकांनी पुढे येणं अत्यावश्यक आहे. “राजकारण वाईट आहे” म्हणून दूर राहिल्यास ती पोकळी अयोग्य लोकांनी भरली जाते. त्यामुळे राजकारणाचा दर्जा सुधारायचा असेल, तर युवकांचा सहभाग हाच एकमेव मार्ग आहे.
आजचा युवक जर राजकारणापासून दूर राहिला, तर उद्याचं राजकारण युवकविरोधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी मतदान करावं, प्रश्न विचारावेत, चर्चेत सहभागी व्हावं आणि गरज भासल्यास राजकारणात उतरावं. कारण देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आणि ताकद दोन्ही युवकांच्या हातात आहे.
एक जागरूक नागरिक – ( उत्कर्ष किशोर भदाणे )









